ऐन उमेदीच्या वयात सहचराची साथ सुटलेली अश्विनी, आज ज्या तडफेनं आणि उत्साहानं मार्गक्रमण करत आहे त्यामागे तिने व तिचा पती अश्विन, यांनी आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर जे सुसंवादाचे पूल निर्माण केले होते त्यांचा मोठाच हातभार आहे. त्यावेळी अश्विनीला बँक व्यवहारापासून ते “अश्विन” च्या व्यवसायापर्यंत सर्व गोष्टींची नीट व्यवस्था लावण्यात या दोघांच्या सुहृदांनी सर्वतोपरी मदत केली. तसंच अश्विनीला तिच्या आवडत्या नाटकलेच्या क्षेत्रात पाय रोवून उभे राहायलाही !
अश्विनी मूळची पुण्याचीच, अश्विनी पुराणिक . भवानी पेठेत ती अकरा जणांच्या एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झाली . शिवाय त्यांच्या घरात तीनशे वर्षाचं जुनं ‘तेलफळा‘ देवीचं देऊळ होतं. त्यामुळे अश्विनीला लहानपणापासूनच देवळातल्या पूजा, अर्चा, नैवेद्य, सण , उत्सव, रुढीपरंपरा , मंत्र जागर इत्यादी साऱ्या गोष्टींचा केवळ परिचयच नव्हता तर त्या करण्यातल्या सहभागाचा आनंदही तिने पुरेपूर लुटला होता.त्यावेळी तिच्या साथीला अर्थातच त्याची चुलत भावंड, आई वडील, काका काकू असे सारेच असत. यातच भर म्हणजे पंढरपूरच्या वारीच्या वेळी वारकऱ्यांच्या दोन दिवसांचा मुक्काम पुण्यात पालखी विठोबा जवळ असतो. तेव्हा तिथल्या रस्त्यावरच त्यांच्या पंगती जेवायला बसतात. त्यावेळी त्यांच्यासाठी लाडू वळणं , त्यांच्यासाठी शिधा बांधून देणे इत्यादी काम रात्री जागून करण्यात किती मजा येई, हे अश्विनीने सांगितलं. अशा या साऱ्या मोठ्या मोठ्या कामांचं मोठंच “खटलं” तिने लहानपणापासून अनुभवलं. त्यामुळे खूप लोकांमध्ये वावरण्याची तिला सवय लहानपणापासूनच झाली. तशी ती लहानपणापासूनच धीट, हसरी आणि उत्साही होती.
अश्विनीच्या आत्याच्या कुटुंबाचे गजानन सरपोतदारांसह अनेक मराठी नाट्य चित्र सृष्टीतील कलाकारांशी उत्तम परिचय होते. त्यामुळे आत्याकडे राहायला गेल्यावर अश्विनीला अशोक सराफ ,रंजना, रमेश भाटकर , अमोल पालेकर अशा दिग्गज कलाकारांना जवळून पाहायला मिळे. सरपोतदारांनी तर तिला लहानपणीच सिनेमात काम करशील का असं विचारलं होतं!
अश्विनीचा चुलत भाऊ त्यावेळी बी. जे. मेडिकलला शिकत होता. तोही नाटकात नेहमी भाग घेत असे. हा भाऊ अश्विनीचा लहानपणापासून आदर्श होता . त्यामुळे त्याच्यासारखंच आपणही नाटकात काम करायचं असं तिने मनाशी ठरवलं होतं. तशी ती पण शाळेच्या सर्व वर्षात नाटकात, नाचात भाग घेत होती . अहिल्यादेवी शाळेत ती पाचवीच्या प्रवेशासाठी गेली तेव्हाच शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंनी तिला नाटकासाठी सिलेक्ट केले . आणि त्या आंतरशालेय स्पर्धेत तिला विदूषकाच्या कामासाठी पहिलं बक्षीसही मिळालं. त्यामुळे पुढे सर्व वर्ष ती नाटकात असणं ओघानच आलं !
कॉलेजमध्ये ही नाट्यकलेत पुढे जाता यावं म्हणून तिने बी. एम. सी. सी. त प्रवेश घेतला. तिथेही प्राध्यापक प्रकाश भोंडे सरांनी तिच्या नाटकाच्या बक्षिसाची यादी बघून तिला लगेच प्रवेश दिला . याचा तिला खूप फायदाही झाला. दरवर्षी तिने नाटकात भाग घेतला. त्यावेळी तिला अभिराम भडकमकर, शिरीष लिमये, प्रसाद वनारसे आदी दिग्दर्शक कलाकारांकडून खूप शिकायला मिळाले. बारावीत असताना तिने उज्वल केसकर यांच्या पुणे युवक केंद्रातर्फे सादर होणाऱ्या नाटकात काम केलं आणि राज्य नाट्य स्पर्धेचा अनुभव घेतला. कॉलेजतर्फे पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक आदी स्पर्धांमध्ये ती भाग घेत होतीच. पुणे युवक केंद्रातही तिने तिला मिलिंद फाटक, रसिका जोशी , प्रसन्न केतकर, सतीश तारे, माधव अभ्यंकर, त्यागराज खाडिलकर यांच्या सारखे कलाकार भेटले आणि त्यांच्याशी मैत्री झाली . अभिजात आणि जागर या संस्थांच्या नाटकातही तिने कामं केली.
बी. कॉम. ची पदवी तिने १९९० मध्ये मिळवली. त्यानंतर तिने दोन तीन छोटे मोठे जॉब केले. वडलांच्या व्यवसायातही हातभार लावला. तिचे वडील प्रारंभी खडकीच्या ऍम्युनेशन फॅक्टरीत एक उच्च पदस्थ अधिकारी होते. अश्विनीच्या जन्मानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि ते स्वतःचा कॉरोगेटेड बॉक्सचा व्यवसाय करू लागले. अश्विनी बी. कॉम. झाली तेव्हा वडिलांनी “स्टेशनरी सप्लाय” चा व्यवसाय सुरू केलेला होता. त्यात अश्विनी मदत करू लागली.
दरम्यान १९९३ मध्ये अश्विनी चा विवाह झाला, अश्विन अंबिकेबरोबर. त्यावेळी अश्विन “प्लॅस्टिक बॉटल्स” बनवण्याचा व्यवसाय करत होता. सासुबाई गोपाळ हायस्कूलच्या प्रिन्सिपल होत्या. सासरी सर्वांचा अश्विनीला सपोर्ट मिळाला. त्यामुळे तिची कला प्रांतातील मुशाफिरी चालू राहिली. १९९७ मध्ये अभिराम च्या एका सिनेमातही तिने काम केलं. तसंच इ.एम.आय.आर. सी. च्या (एज्युकेशनल मीडिया रिसर्च सेंटर) सात आठ शॉर्ट फिल्म मध्ये तिने काम केलं. आपला रोटरी मित्र – बाळकृष्ण दामले ह्याच्या मुळे तिला ही कामं मिळाली . या फिल्म सामाजिक जागृतीच्या दृष्टीने अंधश्रद्धा निर्मूलन , निर्धूर चूल, बँकेचे व्यवहार इत्यादी विषयांवर होत्या. याशिवाय बालचित्रवाणीच्या उपक्रमांमध्ये डबिंग करणे , उसना आवाज देणं इत्यादी गोष्टीही अश्विनी हाताळत होती. त्यांच्या हि फिल्म्स मध्ये कामं केली.